“कृषिक २०२४” जागतिक स्तरावरील प्रात्यक्षिकेयुक्त भारतातील पहिले कृषी प्रदर्शन
कृषी विज्ञान केंद्राचे “कृषिक” कृषी प्रदर्शन दि. 18 ते 22 जानेवारी रोजी
बारामती- अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,कृषि विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीने मागील आठ वर्षांपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे आठवे वर्ष असून दिनांक 18 ते 22 जानेवारी दरम्यान “कृषिक २०२४” हे कृषी प्रदर्शन सुरू राहणार आहे. यंदाचे कृषी प्रदर्शन हे भविष्यातील शेती ही संकल्पना घेऊन आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र दादा पवार यांनी दिली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रा.निलेश नलावडे उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे हित नजरेसमोर ठेवून राज्यभरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्याबरोबरच शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने “कृषिक” कृषी प्रदर्शन दरवर्षी भरवले जाते.
पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन कसे मिळवता येईल यासाठी हे प्रदर्शन शेतकऱ्यांना उपयोगी ठरत आहे. या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत बदल करत अधिकचे उत्पादन मिळवले आहे.
दरवर्षी या कृषीक कृषी प्रदर्शनाला राज्यभरातील लाखो शेतकरी भेट देत असतात. या प्रदर्शनादरम्यान शेती उपयोगी अत्याधुनिक तंत्रज्ञान यासंबंधी शेतकऱ्यांना माहिती दिली जाते तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबाबतचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येते. या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“जागतिक स्तरावरील प्रात्यक्षिकेयुक्त कृषि प्रदर्शनातील भारतातील पहिले कृषी प्रदर्शन”
ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन,मायक्रोसॉफ्ट कंपनी व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,बारामती,महाराष्ट्र शासन कृषि विभाग,नाबार्ड,काही खाजगी कंपन्या यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिक हे जागतिक स्तरावरील शेतीविषयक प्रात्यक्षिके आधारीत कृषि प्रदर्शन १७० एकर प्रक्षेत्रावर या वर्षी दि.१८ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजन केले आहे. या आंतरराष्ट्रीय कृषि प्रदर्शनामध्ये प्रथमच शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर Artificial Intelligence (AI) यामध्ये IOT,AR,VR चा वापर करून ऊस उत्पादन वाढीचे तंत्र,मातीविना शेती प्रयोग,२० हुन अधिक देशाचे प्रगत कृषि तंत्रज्ञान पाहता येईल. देशभरातून दोन लाखापेक्षा अधिक शेतकरी,शास्त्रज्ञ, अधिकारी,उद्योजक भेट देत असतात. याशिवाय जनावरांच्या दुग्धोत्पादन स्पर्धा,उत्तम कालवडीचे प्रदर्शन हि आयोजित केले आहे.